सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड
पनवेल दि.24 (संजय कदम) : पनवेल पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व राहिले. सभापतिपदी महाविकास आघाडीचे नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित होताच सर्व संचालक मंडळासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी सभापती नारायणशेठ घरत व उपसभापती सुनील सोनावळे यांचे अभिनंदन करण्यासाठी शेकाप नेते, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा आ बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख व मा आ मनोहरशेठ भोईर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस पनवेल महानगर जिल्हाध्य्क्ष सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, मा पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, मा नगरसेवक गणेश कडू, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हेमराज म्हात्रे, वैभव पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शेकाप नेते, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले कि, सतरा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती आता महाविकास आघाडीच्या पूर्णपणे ताब्यात आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.
आगामी काळात सिडकोकडे पाठपुरावा करून भव्य अशी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ व मुख्य इमारतीसाठी लागणारा प्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. येत्या नऊ महिन्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे सदर बाजार समितीची इमारत उभारण्यासाठी लागणारा निधीची कमतरता आपल्याला भासणार नाही. यासाठी संबंधित मंत्र्यांकडे मी सुद्धा पाठपुरावा करणार असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले की, पनवेल अर्बन बँकेनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
अशाचप्रकारे आपण एकत्रितपणे पुढील सर्व निवडणूका लढल्यास रायगड जिल्हात दोन खासदार व सात आमदार हे महाविकास आघाडीचेच असतील यात तिळमात्र शंका नाही असेही त्यांनी सांगितले तर मा आ बाळाराम पाटील यांनी सुद्धा सर्व विजयी संचालकमंडळाचे अभिनंदन करीत आगामी काळात सुद्धा विरोधकांना डोकं वर काढून द्यायचे नाही असे कामकाज करा असे सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस पनवेल महानगर जिल्हाध्य्क्ष सुदाम पाटील यांनी सांगितले कि, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा तोच पॅटर्न राबवायचा आहे असे सांगितले तर जिल्हाप्रमुख मा आ मनोहरशेठ भोईर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत या बाजारपेठेत येणार्या शेतकर्यांचे व व्यापार्यांचे प्रश्न सोडवा असे सांगितले.