उरण दि 25( वार्ताहर): सततची अवजड वाहनांची रेलचेल आणि रस्त्यावर वाढते अतिक्रमण यामुळे गव्हाण फाटा – दिघोडे – चिर्ले रस्त्यावर आजही वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे स्थितीत आहे.त्यामुळे प्रवाशी नागरीकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था प्रवाशी नागरीकांची झाली आहे.तरी रस्त्यावर वाढते अतिक्रमण आणि बेशिस्त अवजड वाहनांची रेलचेल यावर उरण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक शाखा उरण यांनी कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण,पेण तालुक्यातील बहुतांश चाकरमानी,प्रवाशी नागरीक हे मुंबई, नवीमुंबई,ठाणे, पनवेल शहराकडे जाण्यासाठी गव्हाण फाटा – दिघोडे – चिर्ले या रस्त्याचा वापर करत आहेत.परंतु मागील तीन वर्षापासून या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंटेनर यार्ड व व्यवसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे.त्यामुळे रस्त्यालगत वाढणार्या अतिक्रमणामुळे व सततच्या बेशिस्त अवजड वाहनांच्या रेलचलीमुळे प्रवाशी वाहतूकीला त्याचा त्रास हा नेहमीच सहन करावा लागत आहे.एकंदरीत रस्त्यावर होणार्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक नोकरदार वर्गाला वेळेवर प्रकल्पात कामा वर न पोहोचता आल्याने आप आपल्या उदरनिर्वाहाचे साधन गमवावे लागले आहेत. तसेच रुग्णालयात उपचारासाठी जाणार्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. निष्पाप प्रवाशांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे.त्यामुळे यासंदर्भात वारंवार प्रवाशांकडून आवाज उठविण्यात आला.परंतु संबंधित प्रशासनाच्या डोळेझाक कारभारामुळे वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे स्थितीत राहीली आहे:
गव्हाण फाटा – दिघोडे – चिर्ले रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी व वारंवार रात्री – अपरात्री उध्दभवणार्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडविण्यासाठी उरण तहसीलदार डॉ उदय कदम, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, वाहतूक शाखा उरण यांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी दिघोडे गावातील सामाजिक कार्यकर्ते – परशुराम पाटील यांनी केली आहे.